Wednesday, 27 August 2014

मार्क झुकेरबर्ग आणि डॉ.विकास बाबा आमटे



फेसबुक नावाच्या विशाल आभासी जगाची निर्मिती मार्क झुकेरबर्ग या तरूणाने केली आहे. ४ फेब्रुवारी २००४ रोजी अमेरिकेतील महाविद्यालयीन मित्रांना बरोबर घेऊन १९ वर्षाच्या मार्कने फेसबुकची पायाभरणी केली. मार्कने सध्या १ अब्ज २३ कोटीपेक्षा जास्त लोकांना या आभासी जगात आणलं आहे. या कामाचा मोबदला म्हणजे तो आता जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत गेला आहे.

कोणी फेसबुकचा कसाही वापर करो; पण मार्क म्हणतो, “फेसबुकला मी कंपनी म्हणून स्थापन केलं नव्हतं. एक सामाजिक अभियान सुरू करण्याचाच तो प्रयत्न होता. मला हे जग अधिक मोकळं आणि जवळ आणायचं होतं.”

मार्कच्या विराट आभासी जगात कसे वागायचे याची शिकवण मराठी माणसाला डॉ.विकास बाबा आमटे यांनी दिली. माझ्यासाठी ते या भासामय जगाचे कुलगुरूच आहेत. फेसबुकच्या जगात कसे वागायचे,कसे लिहियचे,कोणते फोटो दाखवायचे,कोणत्या चित्रफिती सादर करायचे, काय वाचायचे आणि काय शेअर करायचे याचे सुंदर आणि कष्टमय काम डॉ.विकास आमटे यांच्याकडून होतेय. मार्कमुळे डॉ.विकास आमटे यांच्या आनंदवनात थेट प्रवेश मिळवतो. मानवता समजते,निसर्ग ज्ञान होते, पशू-पक्ष्यांची भाषा कळते. डॉ.आमटे यांच्यामुळेच आई कळते, बाबा कळतात, मुले कशी घडवावीत, स्वतःला कसे घडवावे हे कळते. मित्र म्हणजे काय, मैत्री म्हणजे काय याचे धडे डॉ.विकास आमटे यांच्याकडून मिळतात. त्यामुळेच फेसबुकच्या माध्यमातून व्याधीग्रस्त माणसांचे प्राण वाचवण्यासाठी लोक मदतीसाठी धावून जातात.

प्रिय मार्क… तुम्ही एका सुंदर आभासी सृष्टीची निर्मिती केली आहे. ही सृष्टी पाषाणयुगात आहे. त्यात लक्षावधी गुहा आहेत. आम्ही देखील पाषाणयुगातील एका गुहेत आहोत. या गुहेतील पाषाणांवर सध्या मानवजातीच्या इतिहासातील नानाविध चित्रे काढली जात आहेत. त्यात प्राणी,मानव,पक्षी,झाडे, निसर्ग सर्व काही आहेत. आणि ही चित्रे रेखाटणारा महान चित्रकार म्हणजे आमचे.....डॉ.विकास बाबा आमटे..!

प्रकटण्यापूर्वी देव देखील तावूनसुलाखून घेतो



 मूर्तीकाराकडून स्वतःला आकार प्राप्त करून घेणा-या श्रीगणेशाचे आज सकाळी नाशिकमध्ये घेतलेले हे ताजे छायाचित्र.

कष्टाशिवाय फळ नाही. कष्टाशिवाय सुख नाही. कष्टाशिवाय समाधान-शांती नाही. थोर माणसं तहानभूक विसरून आयुष्य झिजवतात;  तेव्हा कुठे सुंदर संकल्पना, वैश्विक तत्त्वांची निर्मिती होते. देवाकडून माणूस घडतो की माणसांकडून देवाची संकल्पना उदयाला येते, असा कूट प्रश्न आहे.

तथापि.....माणसासमोर प्रकट होण्यासाठी देवाला देखील स्वतःला असे भाजून घ्यावे लागते. श्रीगणेशाची सुंदर मूर्ती आपल्यासमोर प्रकटण्यासाठी मानवाकडून अशा प्रकारे तावूनसुलाखून घेते.

“ Your God is ever beside you - indeed, He is even within you”- Alphonsus Liguori (An Italian writer)

महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावरील गाईड



महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीच्या कळसुबाई शिखराच्या पायथ्याजवळ विद्यार्थी दशेतील आदर्शाची उंची गाठलेली एक आदिवासी विद्यार्थीनी रहातेय. तिचे नाव ज्योती काळू खाडे. कळसुबाई माध्यमिक विद्यालयात शिकणारी ज्योती शाळा शिकून कळसुबाईच्या डोंगररांगामध्ये सरबत विकून आई-वडिलांना घरखर्चासाठी पैसे मिळवून देते.

पर्यटक महिलांसोबत ती गाईडचं काम करते. काही वेळा एकाच दिवशी तीन वेळा कळसुबाई शिखरावर महिलांना घेऊन जाण्याचं अवघड जबाबदारी ती पेलते. कळसुबाईच्या डोंगरावर मी ज्योतीची मुलाखत घेतली. “कळसुबाईच्या शिखरावर मला गाईड म्हणून घेवून जाणारे पर्यटक नेहमीच मिळतात असे नाही. पण कधी कधी एका फेरीला १०० ते २०० रुपये मिळतात. हा पैसा मला शिक्षण आणि आई-वडिलांच्या घरखर्चाला उपयोगी येतो. या पैशांमधून आम्ही लिंबू-साखर आणतो आणि त्याचे सरबत विकतो,” असं ज्योती अभिमानानं सांगत होती.

ज्योतीच्या मैत्रिणी कोमल सखाराम खाडे, अलका धर्मा झुरडे, मंगल विठ्ठल खाडे या विद्यार्थीनी देखील गाईडचं काम करतात. “ आम्ही सर्व मैत्रिणींना आता शाळा शिकून कामं करण्याची सवय झाली आहे. कळसुबाईच्या शिखरावर जायला चांगल्या-भक्कम पर्यटकांना अडीच तास लागतात. मी मात्र एक तासात जाऊन येते. त्यामुळेच काही वेळा दिवसभरात तीनदा मी शिखर चढून येते.” ज्योतीनं गाईड म्हणून मी कोणतं शिक्षण घेतलेलं नाही. तिला पर्यटन विभागाकडून देखील काही मदत मिळालेलं नाही. तिची जिद्द कौतुकास्पद आहे. ती खूप आनंदी आहे.

(ज्योतीच्या शिक्षणासाठी कुणाला मदत करण्याची इच्छा असल्यास कळसुबाईच्या पायथ्याजवळ असलेल्या पहिल्या टेकडीवरील झोपडीत ती भेटू शकते. सरबत विकतांना..!  भारतमातेच्या अशा लढवय्या कन्यांमुळे ग्रामीण भारत कष्टातही फुलतो. दुःखातही आनंदानं भरारी घेतो.)

स्वातंत्र्यदिनाची शुभ्र सोनेरी सकाळ

सकाळी लवकर उठून मी रूदनबरोबरच त्याच्या शाळेत स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी गेलो. मुलांमध्ये बसून स्वातंत्र्यदिन साजरा करतांना खूप आनंद मिळत होता. समोर बसलेल्या शेकडो मुलांकडे बघत रुदनच्या मुख्याध्यापिका म्हणाल्या, “ भारत हा सोने की चिडिया होता. लाखो लोकांच्या बलिदान हा देश स्वतंत्र झाला आहे. आता कुणाला बलिदानाची आवश्यकता नाही. मात्र, तुमचे काम तुम्ही निष्टेने केले तर देश पुन्हा सोने की चिडिया बनू शकतो. परीक्षेत ९९ टक्के गुण मिळवणं म्हणजे तुम्ही बुध्दिमान-हुशार होत नाहीत. तुम्ही किती नीतिवान झाला, सुदाचारी झालात यावर तुमची देशभक्ती ठरते.”

वायुसेनेत उच्चपदस्थ अधिकारी असलेले प्रमुख पाहुणे म्हणाले, “ आझादी म्हणजे आपले राज्य असे नव्हे. देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळणे म्हणजे खरे स्वातंत्र्य होय. एका माणसाने स्वातंत्र्य उपभोगतांना दुस-याच्या माणसाची हानी करून त्याचे स्वातंत्र्य हिसकावून घेऊ नये. आपल्या आनंदात इतरांना आनंदी ठेवणे म्हणजे स्वातंत्र्य होय.”

उपमुख्याध्यापकांनी सर्वांचे आभार मानले. तिरंगा आणि विद्यार्थ्यांकडे पाहून त्यांनी एक शेर जोशात पेश केला. ते म्हणाले..                                                                                              
 करो ना फिक्र,
 हम देंगे लहू का तेल
 चिरोगों को जलने के लिए....

मुलांनी टाळ्यांचा कडकडाट केला. चिमुरडया मुलांनी देशभक्तीपर गाणी सुंदरपणे सादर केली. शेवटी लाडूचे वाटप झाले. लाडू घेण्यासाठी मुलांनी मोठी रांग केली. रांगेत उभे राहून रुदनने लाडू घेतला. मी शाळेचा अधिकृत विद्यार्थी नसल्यामुळे रांगेत उभा रहाण्याचा मोह टाळला. मात्र, शाळेच्या गेटमधून बाहेर येताच आम्ही बाप-लेकांनी लाडू वाटून खाल्ला. स्वातंत्र्यदिनाच्या शुभ्र सोनेरी सकाळी रुदनच्या जिभेवर लाडूची चव होती. माझ्या जिभेवर एक अविट गोड असा शेर होता.  
 करो ना फिक्र,
 हम देंगे लहू का तेल
 चिरोगों को जलने के लिए....

माणुसकीची इमारत रचणारा आर्किटेक्ट- भाग 2

गरीब मुलींच्या शिक्षणासाठी उपाशीपोटी डोंगराळ भागात फिरून कष्टाच्या पैशातून रुख्मिणी आणि यशोदाच्या घरात शिक्षणाची ज्योत पेटवणारे आर्किटेक्ट अतुल देशमाने यांच्या हदयी माणुसकीचा झरा अखंड वाहतो आहे. त्या झ-याचे पूर्ण दर्शन होत नाही. मात्र थोडेफार लपून-छपून मला दिसलेले प्रतिबिंब असेः



सामाजिक भावना महाविद्यालयीन जिवनापासून अतुलरावांमध्ये रुजलेली. एकदा अहमदनगर भागात त्यांच्या मोटरसायकलवर एक चिमुकली पळत येत धडकली. चूक त्यांची नव्हती. अतुलराव पळून जाऊ शकले असते. मात्र, चिमुरडीसाठी जागेवर थांबले. जखमी मुलीला उचलले. मुलीच्या औषधोपचाराचा पूर्ण खर्च केला. तिचे प्राण वाचले होते.

गेल्या वर्षी एक चिमुरडी मुलगी नाशिकला तिस-या मजल्यावरून कोसळली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने खर्चिक शस्त्रक्रिया करावी लागली. त्या परिवाराकडे पैसे नव्हते. अतुलरावांनी त्या मुलीसाठी दारोदार फिरून वर्गणी काढली आणि आईकडे सुपूर्द केले. इतके करूनही चिमुरडी वाचली नाही. त्यामुळे अतुलराव बरेच दिवस दुःखी होते. अव्वल दर्जाचे आर्किटेक्ट असलेले अतुलराव इरवी झाडे लावतात. पक्ष्यांसाठी घरटी वाटतात. जखमी पशूपक्ष्यांना दवाखान्यात पोहचवतात.

एकदा नाशिकरोड रेल्वेस्थानकात अतुलराव प्रवासासाठी थांबले होते. एक आजी अस्वस्थ होती. अतुलराव प्रवास,रिझर्व्हेशन सर्व विसरले. आजी डोळ्यासमोर हटेना. झाले तसेच. काही क्षणात आजींनी रेल्वेरूळावर स्वतःला झोकून दिले. अतुलरावांमध्ये माणुसकीचं बळं होतं आणि तेही रूळाकडे झेपावले. रेल्वे येण्यापूर्वी त्यांनी आजीला रेल्वे-ट्रॅकवरून ओढले. आजी म्हणाली, “सोड मला. पोटचा पोरगा बेईमान निघाला. मला घराबाहेर हुसकलं. मला का वाचवलं तू..” असं सांगत आजी रडू लागल्या. तिच्या अश्रूंना मग आर्किटेक्ट अतुलरावांनी साथ दिली. हमसून रडले. या आजीला पुढे अतुलरावांनी लासलगावला कांदाचाळीवर काम मिळवून दिलं. आता ती आनंदात आहे. अतुलराव सुखी आहेत.

(गरिबांना मदत मिळण्यासाठी आर्किटेक्ट अतुल देशमाने अक्षरक्षः लोकांच्या पाया पडतात. संसारातील पैसेही कधी-कधी वाटून टाकतात. त्यामुळे अडचणीत येतात. अडचणीत आल्यानंतर हा देवदूत फुलासारखं गोड हसतो. मात्र, स्वतःची दुखरी नस इतरांना सापडू देत नाही. ते मला मित्र मानतात, हे माझे भाग्य आहे. देवळाबाहेरच्या देवासोबत माझी मैत्री आहे.)

रद्दी विकली, त्याचा हा मनमोकळा हिशेब



घरात भरपूर वर्तमानपत्र येतात. कचराकुंडीवर चाळता चाळता हळूच सोन्याचं झगझगती नाणं दिसवं तसं वर्तमानपत्र वाचता वाचता काही तरी गवसतं. मग मन प्रसन्न होतं. ती एखादी छोटी बातमी असते, लेख असतो, फोटो असतो, शैक्षणिक माहिती असते, गाण्याची ओळ असते किंवा दोन ओळीचा सुविचार असू असतो. मात्र, त्यातून आयुष्य बदलून जातं.

अर्थात, वर्तमानपत्रांची रद्दी देखील मौल्यवान असते. गाडीवर रद्दी टाकून शहरात विकायला नेणं ही बाब दुर्मीळ. त्यात कमीपणा वाटतो. रद्दी विकतांना कोणी पाहिलं तर इभ्रत जायची अशी पक्की भावना असते. त्यामुळे जाहीरपणे कुणी रद्दी विकतांना दिसत नाही. मी थोडा वेगळा प्रयोग करतो. रद्दी जाहीरपणे विकतो. यंदा मुलाला गाडीवर बसवलं. त्याला संकोच वाटला. रद्दीच्या दुकानात गेलो. ३२५ रुपये मिळाले. मुलाला म्हटले, “संकोच करू नको..तू फक्त धीर धर.”  पुढे मुलाच्याच उपस्थितीत रद्दीच्या पैशातून खरेदी झाली. त्याचा हिशेब असाः

शामची आई (इंग्रजी आवृत्ती) पुस्तकाची खरेदी- १०० रुपये
पितृभक्त-मातृभक्त श्रावणबाळ पुस्तकाची खरेदी- ४० रुपये
गोदाकाठी बसून निवांतपणे खाल्लेली भेळ- ३० रुपये
अंगणातील चिमण्यांसाठी १ किलो बाजरीची खरेदी- २४ रुपये
अंगणात येणा-या पोपटांसाठी मका कणीस,पेरूची खरेदी- २० रुपये
नीतिमुल्य कथासंग्रहाची खरेदी- ३५ रुपये
आईच्या गुडघेदुखीवरील मलम खरेदी- ४० रुपये

(आता रद्दीच्या पैशातून ६० रुपये उरले होते. रूदनने “सिंघम रिटर्न्स” सिनेमा दाखवण्याचा हट्ट धरला. त्यात मी ८० रुपये टाकून सिनेमा दाखवला. सिनेमा सुटल्यावर घरी जातांना मी रुदनाला म्हणालो की, बघ ही रद्दीची कमाल आहे. रद्दीच्या पैशातून भरपूर आनंद मिळवता येतो. जगात कशालाही वाईट म्हणता येत नाही. वाईट काय असतं, हे फक्त आपल्या मनाला माहित असतं. सर्वांना फसवता येतं. मनाला नाही. मनाला जे-जे चांगलं वाटतं ते-ते दुस-याला न दुखवता करावं. आनंद मिळवत जगावं..!)

आज जागतिक छायाचित्रदिन



आज जागतिक छायाचित्रदिन...छायाचित्रकारांवर माझी खूप भक्ती आहे. एक छायाचित्र म्हणजे एक कादंबरी असते. या भिकारी आजीचे छायाचित्र मला माझ्याच घरासमोर मिळाले. “भाऊ..मला थोडी भाकर दे..नाही तर एक रुपया दे...तुझी बरकत होईल.” असे सांगत आजींनी आशीर्वादासाठी हात दिला.

आरती प्रभू (चिं.त्र्यं.खानोलकर) यांच्या भाषेत सांगायचे तर...

चार डोळे, दोन काचा, दोन खाचा.
यात प्रश्न येतो कुठे आसवांचा.

(भारतात 35 कोटी लोक दारिद्रयरेषेखाली रहातात. त्यांचा हरवलेला चेहरा म्हणजे ही आजी.)